महाराष्ट्र महाविद्यालयात सायबर गुन्हे व सुरक्षेविषयी जनजागृती कार्यक्रम
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळांतर्गत रसायनशास्त्र विभागाच्या वतीने व सायबर सेल, लातूर यांच्या सहकार्याने सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमूख पाहूणे म्हणून लातूर सायबर सेल चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. सुरज गायकवाड श्री प्रदीप स्वामी, श्री प्रशांत कोळसूरे यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज गायकवाड यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार सांगून सामान्य माणूस व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या गुन्ह्यांमध्ये अडकत आहे. या उपक्रमात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी यासंदर्भात जनजागृती घडवून आणावी असेही आवाहन त्यांनी याप्रसंगी केली. पुढे ते सायबर गुन्हे कोणत्या स्वरूपात घडतात हे सांगताना म्हणाले की, एटीएम, मोबाईल लोन ऐप, सोशल मिडियाच्या माध्यमातुन असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात. अशा गुन्ह्यांपासून सुरक्षीत राहण्यासाठी मोबाईल वरील विविध ऐप वापरत असताना सेंटींग मध्ये प्रायव्हेट सुरक्षा आपण स्विकारली पाहीजे जेणेकरून आपली माहीती आपल्या संपर्काव्यतीरिक्त अनोळखी व्यक्तींकडे जाणार नाही. ही काळजी आपण स्वतः घ्यावी आणि आपले कुटुंबीय व मित्र परीवारात ही माहीती पोहचवावी.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना प्रा. किरण पाटील यांनी सायबर सुरक्षा ही काळाची गरज असल्याचे मत प्रतीपादन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक व प्रभारी प्राचार्य डॉ. धनंजय जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री आदित्य येवते यांनी केले तर आभार विद्यार्थीनी कु. प्राजक्ता पांचाळ हीने मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. सुरेश कुलकर्णी, डॉ. धनराज बिराजदार, श्री प्रकाश सुरवसे, सिध्देश्वर कुंभार यांनी परीश्रम घेतले.