कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितलाय. तुम्ही पंढरपूरचा विठोबा आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थही पळवणार का, असा खडा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.
ठाकरे यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथे आज सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर आयात पक्ष म्हणून जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर प्रखर शब्दांत टीका केली.
उद्धव पुढे म्हणाले की, आपल्या छत्रपतींचा अपमान करायचा. महाराष्ट्रत येणारे उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीसाठी गुजरातमध्ये वळवले. कारण गुजरातच्या निवडणुका जिंकायच्यात. कालसुद्धा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंबलले. त्यांनी सोलापूर, अक्कलकोटवर हक्क सांगितला. भीती याची वाटते. जसे उद्योग गुजरातला नेले, तसे महाराष्ट्राचे तुकडे करायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. का? कर्नाटकच्या निवडणुका. आपले मिंदे मुख्यमंत्री शेपूट घालून बसतील. ठाकरे पुढे म्हणाले की, इकडचे उद्योगधंदे तिकडे न्यायचे. त्यामुळे महाराष्ट्र कंगाल होईल, बेकारी वाढेल. आपली गावे तोडून महाराष्ट्र त्यांच्या घशात घालायचाय. सोलापूर तिकडे गेल्यानंतर पंढरपूरचा विठोबा तिकडे जाणार. हा पंढरपूरचा विठोबा तिकडे गेला, तर शतकानुशतके चालत आलेली परंपरा. ते काय कर्नाटकात टोल भरून जाणार. तुम्ही अक्कलकोटचे स्वामी समर्थ पळवणार का, असा सवालही त्यांनी केला.
लोकशाही हवी की हुकूमशाही…
उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी मातीमधली गद्दारी गाडायची असेल, तर जिजाऊंचे आशीर्वाद घेऊनच पुढे निघाले पाहिजे. आज शहीद दिन, संविधान दिन आहे. नेमके काय बोलायचे हा प्रश्न. शुभेच्छा द्यायचे म्हटले, तरी संविधान आज सुरक्षित आहे का? चार पाच दिवसांपूर्वी मी आणि प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर होतो. त्यांनी प्रश्न विचारला होता, आपल्याला हुकूमशाही हवी की लोकशाही हा महत्त्वाचा प्रश्नय.