महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात पुढच्या आठवड्यात निकालाची शक्यता लागण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. जवळपास एक तास ही भेट झाली. त्यामुळे याची जोरदार चर्चा आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. हा निकाल 8 ते 12 मे या काळात येऊ शकतो. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर?
दरम्यान, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संदर्भातील नियोजित सुनावणी 4 मे रोजीची होती. मात्र, न्यायालयाच्या पटलावर सुनावणीचा समावेश झालेला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. सुनावणी लांबल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? असा ही सवाल उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्यता आहे. याआधी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाजपसोबतची युती करतील आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता, अशा अनेक अफवांनी राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर सत्तासंघर्षावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी विधान केले आहे. कोर्टाच्या सुट्ट्या सुरु होण्याआधी निर्णय लागला तर राज्यातील परिस्थिती बदलेल असं त्यांनी म्हटले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी केले याचे खंडन
शरद पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपशी हातमिळवणी करण्याच्या विचारात असल्याची वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजित पवार सीमारेषेवर आणि पवारांपुढं रडणारे भाजप प्रवेशासाठी दरवाजात उभे होते, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. मात्र, राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी याचे खंडन केले आहे. असं काहीही होणार नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, गेल्या आठवड्यात दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारमध्ये पहारेकरी बदलण्याबाबत. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील आणि देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बढती दिली जाईल, परंतु सर्व राजकीय या अफवा असल्याचे पुढे आलेय.
पवारांच्या घोषणेने राज्याच्या राजकारणात हलचल
दरम्यान, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याच्या अचानक केलेल्या घोषणेने राज्याच्या राजकारणात मोठी हलचल झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा मतदारांवर मजबूत पकड असलेला राष्ट्रवादी हा राज्यातील महत्त्वाचा राजकीय पक्ष आहे. पवार यांच्या घोषणेने पक्षांतर्गत बंडाली जोर धरेल, अशी चर्चा सुरु झाली. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण होणार याचीही चर्चा आहे. खासदार सुप्रिया सुळे या पक्षाचे नेतृत्व करु शकतात, असा विचार पुढे आला आहे. तशी शरद पवार यांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांची महत्वाकांक्षा पक्षातील कौल आणि पक्षाचे नेतृत्व करण्याचा त्यांचा कल सुप्रिया सुळे यांच्यासाठी डोकेदुखी असून शकते, अशीही एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे.