अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समितीने पक्षाचा विस्तार देशभर करण्याची घोषणा तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचेही, राव यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्यातील घडामोडीमध्ये स्वत: लक्ष घातले आहे
त्यातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. त्यामध्ये के. चंद्रशेखर राव (K. Chandrasekhar Rao) महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामध्ये ते नांदेड किंवा छत्रपती संभाजीनगर येथून लोकसभा निवडणूक लढू शकतात, अशी माहिती समोर येत आहे. के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून निवडणूक लढणार असल्याच्या वृत्ताला भारत राष्ट्र समितीचे किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम यांनी दुजोरा दिला आहे.बीआरएसने आपल्या विस्ताराची सुरुवात नांदेड जिल्ह्यापासून केली. मागील चार महिन्यांत के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड आणि लोहा येथे दोन जाहीर सभा घेतल्या आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली आहे. या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच येथील मुस्लीम मतांवर भारत राष्ट्र समितीचा डोळा आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून केसीआर लोकसभा लढण्याची अधिक शक्यता असल्याचेही बोलेल जात आहे.महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे दोन दिवसांचे शिबीर NANDED नुकतेच घेण्यात आले. या शिबिराला महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघापैकी २७८ मतदारसंघातले प्रतिनीधींनी हजेरी लावली होती. पक्षा विस्तार देशात करायचा असेल तर त्याची सुरुवात ही महाराष्ट्रातून करावी, यासाठी केसीआर प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणूक आहे. त्यामुळे जर के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांचा उपयोग त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो. महाराष्ट्रात BJP व शिंदे गटाच्या विरोधात महाविकास आघाडी असा सामना आहे. त्यामध्ये जर के. चंद्रशेखर राव यांनी उडी घेतली तर त्यामुळे राज्यातील पक्षांसमोर तगडे आव्हान उभे राहु शकते. भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रातील २८८ मतदार संघात सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्याचे ठरले आहे. नागपूर जिल्ह्यात आज (ता. २५) मे पासून हे नोंदणी अभियान सुरू करण्यात येत येणार आहे.