Kherkatta Reservoir News : एक वेळ खिशात रूमाल नसला तरी चालेल, पण मोबाइल असला पाहिजे, असं वाटायला लागण्याचे सध्याचे दिवस आहेत. मोबाइल हा जणू जीवनावश्यक झाला आहे. त्यामुळंच मोबाइल नसला की अनेकदा माणसं कासावीस झालेली बघायला मिळतात. त्या अस्वस्थेतून कोणतंही पाऊल उचलताना दिसतात. छत्तीसगडमध्ये असाच एक विचित्र आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.
छत्तीसगडच्या पंखजूरमध्ये एका अधिकाऱ्यानं धरणात पडलेला मोबाइल शोधण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया घालवल्याचं समोर आलं आहे. कोयलीबेडाचे अन्न निरीक्षक खेरकट्टा परळकोट जलाशयावर सुट्टीसाठी गेले होते. येथे अंघोळ करत असताना अधिकाऱ्याचा महागडा फोन पाण्यात पडलामोबाइल पाण्यात पडल्यानंतर त्यांनी सर्वात आधी डायव्हरची मदत घेतली. तिथल्या गावकऱ्यांनाही मोबाइल शोधण्यासाठी सांगण्यात आलं. मात्र, मोबाइल काही मिळाला नाही. त्यामुळं मग खेरकेट्टा यांनी १५ फुटांपर्यंत भरलेलं धरण रिकामं करण्याचा निर्णय घेतला. पंप बसवून पाणी बाहेर काढण्याचा आदेश दिला. तीन दिवस पंप चालू राहिल्यानं पाणी तब्बल २१ लिटर पाणी वाहून गेले. शेवटी मोबाइल मिळाला पण बराच वेळ पाण्यात राहिल्यानं तो खराब झाला होता.धरणातून सोडलेल्या पाण्यामुळं १,५०० शेतांचं सिंचन होऊ शकलं असतं असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वरिष्ठांनी या प्रकाराची तातडीनं दखल घेऊन अन्न निरीक्षक खेरकेट्टा यांना निलंबित केलं आहे.
३० एचपी पंप ३ दिवस चालला!
परळकोट जलाशयातील पाणी बाहेर काढण्यासाठी ३० अश्वशक्तीचा पंप तीन दिवस चालवण्यात आला. जास्तीचे पाणी वाहून गेल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंप बंद करून घेतला. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. जलाशयातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला होता.