शेतकऱ्यांनो, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करा !
- कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
- पेरणीसाठी 80 ते 100 मिलीलीटरपाऊस आवश्यक
लातूर, (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करता, पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन लातूरच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रक्षा शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यात 30 जून 2023 पर्यंत 651 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. औसा तालुक्यात 29 हेक्टरवर, निलंगा तालुक्यात 510 हेक्टरवर, रेणापूर तालुक्यात 37 हेक्टरवर, देवणी तालुक्यात 70 हेक्टरवर आणि जळकोट तालुक्यात 5 हेक्टरवर खरीप पेरणी झाली आहे.
कृषि विद्यापिठाने किमान 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी शिफारस केलेली आहे. किमान 80 – 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो. त्यामुळे खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यास पावसाच्या खंड काळात पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन श्रीमती शिंदे यांनी केले आहे.