राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजीक जाणिवा निर्माण करते – सुधाकर देशमुख
निलंगा: राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सेवेचे भान निर्माण करत असते, त्यामुळे त्यांच्यात सामाजिक जाणिवा निर्माण होतात. रासेयोच्या विद्यार्थ्यांकडे समाज विश्सासार्हतेने पाहतो त्याचे कारण हा विद्यार्थी सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून काम करत असतो. विद्यार्थ्यांना यातून श्रमाचे मुल्य कळते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यासाठी काबाडकष्ट करणाऱ्या आई वडिलांच्या डोळ्यात आपल्याबद्दलचे त्यांनी साठवलेले स्वप्न बघीतले पाहीजे. उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघीतले पाहीजे. आपल्या कुटुंबाला समजून घेतले पाहिजे त्यातुनच समाजाकडे पाहण्याची नवी दृष्टी आपल्याला मिळते. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना सर्वार्थाने समृध्द बनवणारी शाळा आहे. महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नवप्रवेशीत विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधुन उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ममदापुर पाटोदा येथील महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त वृक्षमित्र मा. सुधाकरराव देशमुख हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक तरी झाडाचे रोप लावून त्याचे संवर्धन करुण खऱ्या अर्थाने झाड बनवले पाहीजे असे आवाहन आपल्या बहारदार अशा ‘एक तरी झाड लाव’ गिताच्या माध्यमातून केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे होते. त्यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना विद्यार्थी खऱ्या अर्थाने माणूस म्हणून रासेयोतूनच घडत असतो. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्देशांनुसार आपण वर्तन केले पाहीजे. राष्ट्रीय सेवा योजनेचा बिल्ला हा सळसळत्या तरुणाईचे प्रतीक आहे. या तरुणाईला विधायक वळण देण्याचे कार्य रासेयोच्या माध्यमातून होते. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेत अधिकाधिक सक्रीय असले पाहीजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष बेंजलवार यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबविले जाणारे नियमित उपक्रम आणि वार्षिक शिबिर, जिल्हा, विद्यापीठ, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध शिबिरांची व त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहीती दिली. या कार्यक्रमास आयक्युएसीचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चौधरी, ग्रीन क्लबचे समन्वयक डॉ. शेषराव देवनाळकर, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी व्यक्त केले. तर सुत्रसंचलन रासेयोचे विद्यार्थी शरद जाधव, महेश तिडके, धुमाळ आकाश यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी व श्री गणेश वाकळे, श्री सिद्धेश्वर कुंभार, रासेयो विद्यार्थी हृतीक पाटील इत्यादिंनी परीश्रम घेतले.