लोकांना आता मोदी नको, हुकूमशाही नको, तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. आज(Jalgaon) जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, मी कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एक महिन्याचे धान्य शिल्लक होते. मी अस्वस्थ झालो. आमच्या लोकांना खायला नाही. शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे. मागील काळात आपण शेतीसाठी दिंडी काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या का करतो? म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. मागील काळात 61 हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.
मोदी भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागताय
आज देशाचे चित्र बदललेले आहे. जो देश धान्य आयात करत होता आता तोच देश निर्यात करत आहे. हे शेतकऱ्यांनी केले आहे. जगभर साखर पुरवली जात आहे. आज मोदी यांचे राज्य आहे. बळीराजाला मदत होईल असे काही नाही. जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली जात आहे. ज्यांनी देशासाठी खस्ता खायल्या आहेत त्यांच्यावर टीका करणे हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? आपण देशाचे पंतप्रधान आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. ते भाजपचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत.