आ. अभिमन्यू पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी, संततधार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर नुकसानभरपाई मंजूर
औसा -आमदार अभिमन्यू पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून लातूर जिल्ह्यासह संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील सुमारे ५ लक्ष शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील ३.४२ लक्ष शेतकऱ्यांना २९० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणं अपेक्षित आहे. या संदर्भात आ. अभिमन्यू पवार यांचे मदत कार्य व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी बोलणे झाले असून मदतीचे शासकीय आदेशही लवकर निघणार आहेत.
आ. अभिमन्यू पवार यांचा पाठपुरावा औसा मतदारसंघासह लातूर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांसाठी फलदायी ठरला असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच लातूर जिल्ह्याला गोगलगाय नुकसान भरपाईपोटी ९४ कोटी रुपये आणि आता संततधार नुकसान भरपाईपोटी २९० कोटी असे एकूण ३८४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यावर्षी गोगलगायी व सतत पडणाऱ्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे हातचे आलेले पीक निघून गेले याबाबत आमदार अभिमन्यू पवार यांनी पावसाळी अधिवेशनात २९२ च्या प्रस्तावावर चर्चा घडवून आणली त्या नंतर लक्षवेधी करीत लातूर,उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोगलगायी व संततधार पडणाऱ्या पावसाच्या नुकसानीची मदतीची मागणी केली होती. शासनाने मदतीचे आश्वासन देऊनही आदेश निघत नसल्याने त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत दोन ते तीन वेळा तर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडेही हि मदत देण्यासाठी पाठपुरावा केला होता.एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार व मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य असलेले लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आभार मानले आहेत.संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.