संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात होईल. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर होणार आहे. मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांचा पक्ष, AAP, केसीआर यांचा पक्ष BRSसह अनेक विरोधी पक्ष राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकू शकतात. त्याचवेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. महागाई, चिनी सैन्याची घुसखोरी, बीबीसी डॉक्युमेंट्री, काश्मिरी पंडितांची सुरक्षा, राम रहीमचा पॅरोल, हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी या मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात.
एक दिवस आधी सर्वपक्षीय बैठक पार पडली, 27 पक्षांचे 37 नेते उपस्थित
याआधी सोमवारी सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीत 27 पक्षांचे 37 नेते उपस्थित होते. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, बैठक चांगली झाली. सभागृहाचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी आम्ही विरोधकांचे सहकार्य मागतो. आम्ही सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहोत. या बैठकीला काँग्रेस आणि सपाचे नेते उपस्थित नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस पक्षाने पत्र लिहून कळवले होते की, हवामानामुळे ते काश्मीरमध्ये अडकले आहेत, त्यामुळे त्यांचे नेते येऊ शकले नाहीत. 31 जानेवारीला पक्षाकडून स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल.