राज्यातील काही भागांमध्ये अजूनही अवकाळी पावसाचा धुमाकूळ चालूच आहे. एकीकडे प्रचंड उकाडा तर दुसरीकडे मुसळधार पाऊस अशी विचित्र स्थिती सध्या झाली आहे. तर पश्चिम बंगालच्या उपसागरात येत्या दोन दिवसात मोचा चक्रीवादळ धडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचा थेट परिणाम होणार नसला तर हवामानत मात्र पुढचे काही दिवस बदल होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील असं सांगण्यात आलं आहे.पश्चिम महाराष्ट्रात पुणे, अहमदनगर, नाशिक, मराठवाड्यामध्ये परभणी लातूर आणि हिंगोली या भागांमध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागात हवामान विभागाने ऑरेंट अलर्ट दिला असून शेतकऱ्यांना आपल्या पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहनही केलं आहे.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवड्यापासून पावसानं खो घातला आहे. शेतात तयार झालेलं पीक पावसानं भुईसपाट केलं. यवतमाळमध्ये शेतकऱ्याचा कांदा सडला. तर पावसामुळे रब्बी आणि खरीप पिकाचंही मोठं नुकसान झालं. कोकणात आंबा काजूवरही मोठा परिणाम झाला आहे.
पाऊस काही थांबायचा नाव घेत नाही रोज पाऊस होत असून अवकाळी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी मनमाड शहर परिसरा सोबत ग्रामीण भागाला झोडपून काढले. में महिन्याच्या कडक उन्हाळ्यात पावसाळ्या सारखा पाऊस होत असून त्याचा फटका कांदा आणि टोमॅटो पिकाला मोठ्या प्रमाणात बसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर तालुक्यात रात्रभर जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अर्धापुर तालुक्यातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतातून देखील मोठ्या प्रमानात पाणी वाहत आहे . काही ओढ्याना रात्री पूर देखील आला होता. तसेच अर्धापुर शहरातील सिंचन नगर भागात पाणी साचले. गेल्या दहा दिवसांपासून सतत पाउस सुरु आहे .. त्यामूळे उन्हाळयात पावसाळ्यासारखी परिस्तिथी निर्माण झाली.