देशात मॉन्सून रखडलेल्या अवस्थेत आहे. वातावरण पोषक असतांना देखील मॉन्सूनची प्रगती ही होतांना दिसत नाही. ११ जूनला जी परिस्थिती होती तीच परिस्थिती आजही कायम आहे.
पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या मॉन्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. मात्र, असे असतांना देखील ११ जून रोजी जी स्थिती होती तीच स्थिती कायम आहे. यामुळे राज्यात अद्याप मॉन्सून हा सक्रिय झाला नसून त्याला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. मोसमी वारे वेगाने वाटचाल करतील, असे सातत्याने सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात ११ जून रोजी मोसमी वाऱ्यांची जी स्थिती आहे, ती रविवारी सायंकाळपर्यंत कायम होती.
११ जून रोजी तळकोकणासह कोल्हापूरच्या काही भागात मोसमी वारे दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली होती. रविवारी सायंकाळपर्यंत मोसमी वाऱ्यांची स्थिती ही जैसे थे होती. तळकोकणातही अद्याप मोसमी पाऊस सुरू झालेला नाही. दरम्यान, होसाळीकर यांनी मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण असून, पुढील तीन दिवसांत मोसमी वारे मध्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखल होतील, असे म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात १५ जून होऊनही अद्याप मॉन्सून सक्रिय झालेला नाही. दरवर्षी ९ जून पर्यंत संपूर्ण राज्यात मॉन्सून सक्रिय होत असतो. यावर्षी मात्र, मॉन्सून लांबला आहे. अनेक जिल्ह्यात पावसाअभावी उष्णतेची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आणि देशात रखडलेला मान्सून २३ जूनपासून पुन्हा सुरळीत होऊ शकेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला असून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास आणखी काही अवधी लागल्याची चिन्हे आहेत.