• Thu. May 9th, 2024

लातूरची शांततेची परंपरा कायम राखून प्रशासनाला सहकार्य करा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

Byjantaadmin

Oct 31, 2023

लातूरची शांततेची परंपरा कायम राखून प्रशासनाला सहकार्य कराजिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

  • मराठा संघटनांच्या प्रतिनिधींना पोलीस अधीक्षक कार्यालयातील बैठकीत आवाहन

लातूर, दि. 31 (जिमाका) : लातूर जिल्ह्याला शांततेची पूर्वापार परंपरा आहे. तीच परंपरा यापुढेही कायम राहावी, यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि मराठा बांधवांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागेल, असे कृत्य कोणीही करू नये, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी त्यांचे प्रबोधन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सोमवारी रात्री झालेल्या मराठा समाज प्रतिनिधींची बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्यासह मराठा समाजाच्या संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

सकल मराठा समाजाने आजवर शांततेने आंदोलन केले असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहण्याच्या दृष्टीने यापुढेही या आंदोलनाला गालबोट लागणार नाही, यासाठी मराठा समाज प्रतिनिधींनी दक्षता घ्यावी. तसेच या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेळीच बाजूला करून त्यांचे प्रबोधन करावे. कोणीही कायदा हातात घेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी केले.

लातूर जिल्ह्याची परंपरा कायम शांतता आणि सौहार्दतेची राहिली आहे. ही परंपरा कायम राहावी, यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी सामंजस्याची भूमिका घेवून समाज बांधवांना मार्गदर्शन करावे. कोणत्याही स्थितीत जिल्ह्यात अनुचित घटना हाडु नयेत, जिल्ह्यातील शांतता अबाधित रहावी, यासाठी मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व मराठा समाज बांधवांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. तसेच शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला गालबोट लागू नये, सामान्य नागरिकांना त्रास होवू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच बाहेरून येवून शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास, अशा व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस अधीक्षक सोमय मुंडे

मराठा समाजाचे आंदोलन जिल्ह्यात शांततेत सुरु असून त्याला आतापर्यंत कोणतेही गालबोट लागलेले नाही, याचे सर्व श्रेय मराठा समाज बांधवांना आहे. यापुढेही हे आंदोलन शांततेत सुरु राहावे, यासाठी मराठा समाजाने प्रशासनाला सहकार्य करावे व पोलीस प्रशासनाला वेळोवेळी माहिती द्यावी. जेणेकरून आंदोलनात कोणतेही समाजकंठक सहभागी होवून जाळपोळ, तोडफोड करणार नाहीत. मराठा समाज बांधवांनी सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास न ठेवत सामंजस्याची भूमिका घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले. तसेच पोलीस प्रशासनाचे सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *