आम्ही ओबीसी कुणबी हे सिद्ध झालं मग आम्हाला उगाचच स्वतंत्र आरक्षणाच्या फुफाट्यामध्ये कशाला टाकत आहात, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर पोरांचे हाल होतील. आम्ही ते नाकारलं नाही पण ते आरक्षण टिकलं पाहिजे, ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. नाही तर तोच पाढा पुन्हा वाचावा लागेल. सरकार आम्हाला २० तारखेपर्यंत आरक्षण देईल, असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही मुंबईला जात आहोत. आम्ही मुंबईत पोहोचल्यानंतर मराठा समाज हा वारुळातील मुंग्यांसारखा बाहेर पडेल. मग तिकडे आम्हाला मारलं तरी आम्ही मागे हटणार नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. ते बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
अयोध्येतील राममंदिराविषयी जरांगे-पाटील काय म्हणाले?
अयोध्येत होणारा राममंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा हा देशाचा सोहळा आहे. मी त्याच संस्कृतीचा आहे. मी देवाला मानतो, त्याची भक्ती करतो. पण मला आडवं जाणाऱ्याला सोडत नाही. कोणी कुठेही आनंद साजरा करु शकतो. आमचं आंदोल हे गेल्या पाच महिन्यांपासून सुरु आहे. गेल्यावेळच्या आंदोलनानंतर ५४ लाख लोकांना लाभ झाला आहे. आता पुढच्या आंदोलनासाठी २० तारीख ठरली आहे. केंद्र सरकारला काय सांगावं, ते मोठी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी शिर्डीला आले तेव्हा त्यांना मराठा आरक्षणाविषयी सांगितलं, पण त्यांना महत्त्व वाटलं नाही. मग मराठा समाजाने पुन्हा पुन्हा अपमान करुन का घ्यावा? आमचंही काहीतरी स्टेटस आहे. आता अंतरवाली सराटीसारखा प्रयोग करुन नका, ते तुम्हाला जड जाईल. आझाद मैदानासाठी आम्ही अद्याप अर्ज केलेला नाही, आता तो करु. मुंबईतील मराठा बांधवांना माझी एकच विनंती आहे की, सगळ्यांनी गटतट तोडून एकत्र या, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.