• Fri. May 3rd, 2024

“भाजपाला ४०० पार व्हायचं असेल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान…”, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा टोला

Byjantaadmin

Apr 20, 2024

लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळविण्यासाठी भाजपाने यंदा ‘अब की बार ४०० पार’, असा नारा दिला आहे. पण हा नारा व्हॉट्सॲप विद्यापीठासाठी चांगला आहे. पण प्रत्यक्षात एवढ्या जागा मिळवणे भाजपाला शक्य होणार नाही, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते रेवंत रेड्डी यांनी केली आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत असताना रेवंत रेड्डी यांनी भाजपावर जोरदार टीका केली. तसेच भाजपाला जर ४०० हून अधिक जागा मिळवायच्या असतील तर शेजारच्या बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्येही त्यांना निवडणूक लढवावी लागेल, असा टोला लगावला.

४०० पार जाणे हे भाजपासाठी दिवास्वप्न कसे ठरू शकते, याचेही विश्लेषण रेवंत रेड्डी यांनी केले. ते म्हणाले, “भाजपाने राजस्थानमधील सर्व २५ जागा, गुजरातमधील २६, हरियाणातील १०, दिल्लीमधील ७, बिहारमध्ये ३९ किंवा ४०, उत्तर प्रदेशमध्ये ६२, पश्चिम बंगालमध्ये १८ आणि उत्तर भारतातील इतर ठिकाणांहून ८० ते १०० टक्के जागा जिंकल्या तरी ते ३०० च्या आसपासच राहतात. तर दक्षिण भारतातील राज्यात १३० लोकसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणाहून भाजपाला १५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत. त्यामुळे ४०० पार जायचे असेल तर भाजपाला शेजारच्या बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये काही जागा जिंकाव्या लागतील.”

काँग्रेसला किती जागा मिळणार?

भाजपा किती जागा जिंकणार? याबाबतचे विश्लेषण रेवंत रेड्डी यांनी केल्यानंतर त्यांनाcongress किती जागा जिंकणार याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष हा इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. इंडिया आघाडीला २७० हून अधिक जागा मिळतील. तेलंगणामधील १४ जागा काँग्रेसला मिळतील. तसेच केरळमध्ये सर्वच्या सर्व २० जागा आम्ही जिंकू. तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमधून आम्ही ४० जागा जिंकू. कर्नाटकमध्ये काँग्रेसला एकूण जागांच्या अर्ध्या जागा मिळतील.”

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणात भारत राष्ट्र समिती आणि भाजपाची लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संगनमत झाले असल्याचा आरोप केला होता. महबुबाबाद येथे जाहीर सभेत बोलत असताना रेवंत रेड्डी म्हणाले की, बीआरएस आणिbjpएकच आहेत. ते पडद्याआडून एकमेकांना मदत करत असतात. कारण त्यांना माहितीये की, ते लोकांसमोर उघडपणे एकत्र आले तर त्यांना मतं मिळणार नाहीत. ज्यापद्धतीने माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या के. कविता यांना जामीन मिळाला आहे. त्यावरून तरी बीआरएस भाजपासाठी पाच लोकसभा मतदारसंघात काम करत आहे, हे स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *