देशहिताचा दृष्टिकोन असणार्या नरेंद्र मोदींच्या पाठीशी रहा -युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर
निलंगा/प्रतिनिधी ः नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून दहा वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागात रस्त्याची कामे मुंबई -पुण्यासारखी होत आहेत. महिला, युवक, शेतकरी यांच्या हिताचे निर्णय आजपर्यंत घेतले जात आहेत. कणखर आणि दमदार नेतृत्व आपल्या देशाला लाभले असून अनेक क्रांतिकारी निर्णय झाले आहेत. देशहिताचा दृष्टीकोन असल्यामुळेच हे सर्व शक्य झाले असल्याचे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले.
निलंगा विधानसभा मतदारसंघात हेळंब, हिसामनगर, वलांडी, कवठाळा येथे आयोजित बैठकांमध्ये निलंगेकर बोलत होते. व्यासपीठावर देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे, तालुका प्रभारी दगडू सोळुंके, संजय दोरवे, शेषराव ममाळे, शिवसेनेचे सुधीर पाटील, प्रशांत पाटील, तम्मा माडीबोने, सुमीत इनानी, रवि फुलारी आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की, देव, देश, धर्म अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सामाजिक आर्थिक व गरीबीची जाण तसेच गावच्या रस्त्याचा विकास होण्याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधान झाल्यापासून सलग साडेतीन हजार दिवस समर्पित भावनेने ते काम करत आहेत. प्रत्येक सण उत्सव सीमेवर जाऊन सैनिकांसोबत साजरे करतात. पूर्वी केंद्रातून एक रूपया पाठवल्यानंतर गरजू लाभार्थ्यांपर्यंत फक्त पंधरा पैसे यायचे आता जनधन खात्याच्या माध्यमातून सर्व पैसे शेतकर्यांच्या खात्यावर पडत आहेत. या सरकारच्या काळात एकाही योजनेत भ्रष्टाचार झालेला नसल्याचे ते म्हणाले.