रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीतून घेणार कोच प्रकल्पाचा आढावा
नियोजित लातूर दौरा पुढे ढकल्याची आ. निलंगेकरांकडून माहिती
लातूर/प्रतिनिधी ः- देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे कोच प्रकल्प लातूरात उभारला जात आहे. या बोगी प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आलेले असून सदर कोच प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दि. 3 ऑक्टोबर रोजी लातूरात येणार होते. मात्र सदर दौरा पुढे ढकल्याची माहिती देत आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीतूनच कोच प्रकल्पाचा आढावा घेणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.
लातूर येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे कोच प्रकल्प उभारला जात आहे. तात्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोच फॅक्टरी उभारणीचा भुमिपुजन समारंभ पार पडलेला होता. या समारंभातच या प्रकल्पाचे नामकरण मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्प असे करण्यात आले होते. त्या प्रकल्पात मेट्रोसह वंदे मातरम् रेल्वेसाठी कोच तयार करण्यात येणार आहेत. सदर प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आलेले आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावा या दृष्टीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दि. 3 ऑक्टोबर रोजी लातूरात येऊन या प्रकल्पाची पाहणी करत आढावा घेणार होते.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हेही उपस्थितीत राहणार होते. मात्र रेल्वेमंत्री वैष्णव यांचा लातूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. सदर दौरा रद्द झालेला असला तरी प्रकल्पाचा आढावा दिल्लीतूनच रेल्वेमंत्री वैष्णव घेणार असल्याची माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. त्याचबरोबर लवकरच कोच प्रकल्पाची पाहणी दौर्याची नवीन तारीख जाहीर होणार असल्याचे आ. निलंगेकरांनी सांगितले आहे.