सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलहे भाजपच्या (BJP) वाटेवर आहेत की नाहीत, हे मला माहिती नाही. मी अनेकजण असं बोललो, जयंत पाटील हे नाव मी घेतलेले नाही. त्यांना जेव्हा अजितदादाआहेत का, असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा नारायण राणे यांनी ‘ते सीमारेषेवर आहेत’, असे उत्तर दिले. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबतचे भाष्य केले. ते म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा परत घ्यावा, म्हणून त्यांचेच कार्यकर्ते डोके आपटत आहेत. ते जे डोकं आपटत आहेत, तेच काही दिवसांपूर्वी भाजपच्या दारात प्रवेशासाठी उभे होते. तेच तिथं रडताना मी पाहिले. मी त्याला ढोंग वगैरे काही म्हणणार नाही. पण पवार यांनी घेतलेला जो निर्णय आहे, तो त्यांचा वैयक्तीक निर्णय आहे आणि पक्षासंबंधी घेतलेला आहे.
जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, या प्रश्नावर मात्र राणेंनी सावध भूमिका घेत मला माहिती नाही. मी अनेकजण असं बोललो, जयंत पाटील हे नाव मी घेतलेले नाही, असे स्पष्ट केले. तेवढ्यात अजितदादा आहेत का, असा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा नारायण राणे यांनी सीमारेषेवर आहेत, असे स्पष्टपणे सांगितले.
ठाकरे-राऊतांना राणेंचा टोला
खासदार संजय राऊत जे बोलतात ते खरं नसतं. त्यामुळे त्यांच्याबाबत मला प्रश्न विचारू नये. उद्धव ठाकरे सात तारखेला बारसूला जाणार आहेत, तर मीही बारसूला जाणार आहे. मी प्रकल्पाला समर्थन देण्यासाठी कोकणात जाणार आहे. मला तो रिफायनरी प्रकल्प कोकणात हवा आहे. दीड लाख कोटींची त्या प्रकल्पावर गुंतवणूक होणार असून त्या प्रकल्पाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. उद्धव ठाकरेंचं काय जातं, सगळंच नको म्हणतात. विनायक राऊत वगैरे भिकारमंडळी आहेत. सध्या त्यांना कामधंदा नाही, त्यामुळे सगळे जात आहेत, असा टोलाही राणेंनी ठाकरे-राऊतांना लगावला.