येत्या ३० जूनला राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होणार आहे. वर्ष होत असलं तर सरकार स्थापन झाल्यापासून केवळ २० मंत्री राज्याचा गाडा हाकत आहे. त्यामुळं विरोधकांसह काही सत्ताधारी आमदारांनी अनेकदा कॅबिनेट विस्ताराची मागणी केली. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोनदिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही नेत्यांच्या या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असून कॅबिनेट विस्तार कधी करायचा, याचीही तारीख समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता शिंदे गट आणि भाजपाच्या गोटात चलबिचल सुरू झाली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सव्वा महिना राज्याचा कारभार पाहिला होता. त्यानंतर कॅबिनेट विस्तार करण्यात आला, त्यात भाजपचे १० आणि शिंदे गटाचे १० अशा २० आमदारांना संधी देण्यात आली. परंतु दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सत्ताधारी आमदारांकडून कॅबिनेट विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाब टाकला जात असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळंच आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि आमदारांची नावं फायनल होणार असल्याची माहिती आहे. शिंदे गटासोबत असलेल्या अपक्ष आमदारांचं काय होणार, यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन्ही नेत्यांना भेटणार आहे. त्यामुळं आता दिल्लीतील नेत्यांच्या भेटीगाठी झाल्यानंतरच कॅबिनेट विस्तारावर फायनल निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा सुरू होण्यापूर्वीच भाजपा व शिंदे गटातील अनेक आमदारांनी मंत्रिपदासाठी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा रंगलेली आहे.