मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन (शिंदे गट) मुंबईत नेस्को सेंटरमध्ये झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आण ठाकरे गटातील नेत्यांच्या आरोपांचा आणि टीकांचा समाचार घेतला. तेच टोमणे, तेच आरोप, दुसरं काहीच नाही. तीच कॅसेट किमान स्क्रिप्टरायटर तर बदलवा. पण आम्ही आरोपांना उत्तर कामाने देणार, हेच बाळासाहेबांनी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलं आहे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.शिवसैनिकांच्या आणि नेत्यांच्या रक्तातून, घामातून, कष्टातून शिवसेना मोठी झाली. टपरीवाला, चहावाला, रिक्षावाला आणि भाजीवाला यांनी शिवसेना मोठी केली. यांना तुम्ही हिणवातय. पण यांना घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली. फाटक्या लोकांना घेऊन शिवसेना मोठी केली. त्यांनाच हिणवताय, हा बाळासाहेबांचा अवमान आहे. तुम्ही कुठे होता? किती केस झाल्या तुमच्यावर? असा सवाल म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केला.
मराठी माणसाच्या न्याय हक्क्साठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली. आज शिवसेनेला ५७ वर्ष होत आहेत. गेलं वर्ष शिवसेनेतल्या इतिहासातलं ऐतिहासिक वर्ष होतं. गेल्या वर्षी २० तारखेला क्रांतीला सुरुवात केली. अनेकांनी आपल्या उठावाची दखल घेतली. आणि ३० तारखेला शिवसेना-भाजप युतीची सत्ता स्थापन केली. आणि म्हणूनच हा वर्धापन दिन आपल्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेने कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. कार्यकर्त्यांना निवडून आणलं आहे. मिळेल ते काम केलं. कष्ट केलं. सीमा लढ्यात वयाच्या २१वर्षी बेळगावच्या तुरुंगात ४० दिवस होतो. अनेकदा तुरुंगात गेलो. अनेक शिवसैनिकही गेले. व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनीही तेच केलंय. म्हणून शिवसेना मोठी झाली आणि पुढे गेली. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो. बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादाने पोहोचलो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सभा पूर्ण करून आलो आणि आईचं अंत्यदर्शन मी हॉस्पिटलमध्ये घेतलं. काय मिळवलं आम्ही? ही काय चूक केली? अशा घटना आणि प्रसंग अनेक नेत्यांच्या जीवनात घडलेत. आपल्या आधारामुळे बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे हा एकनाथ शिंदे तुमच्यासमोर उभा आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यावेळी भावुक झालेले दिसले
उद्धव ठाकरे भाषणात बोलता बोलता बोलले, आपल्या गद्दारीला एक वर्ष झाला. आणि लगेच त्यांनी दुरुस्त केलं. आपल्यामधून गेलेल्यांना. पण तुम्हीच गद्दारी केली अन् तारीख विसरलात. तुम्ही सत्तेसाठी खुर्चीसाठी स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.तुमची कोल्हेकुई कधीपर्यंत सुरू असते, जेव्हा वाघ डरकाळी फोडेपर्यंत. वाघ जंगलात आल्यावर सगळे कुठे पळतात हेही माहित आहे. गेल्या २० तारखेला उठाव केला. हे करायलाही वाघाचं काळीज लागतं. मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्यात बदल होणार नाही. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आम्ही काम करतो तुम्ही आरोप करत राहा. जनता सुज्ञ आहे हे सर्व जाणून आहे, असं ते पुढे म्हणाले.