प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी निकषांची पूर्तता करावी -कृषी संचालक दिलीप झेंडे
लातूर, (विमाका) : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असलेल्या बाबींची पूर्तता केलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ केंद्र शासन देत आहे. तसेच पी.एम. किसान योजनेच्या 16 वा हप्त्याचा लाभ जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे योजनेच्या लाभासाठी नोंदणी करणे,ई- केवायसी करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता योजनेचा 16 वा हप्ता वितरणापूर्वी शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यासाठी पी. एम. किसान योजनेच्या निकषांच्या अधिन राहून शेतकऱ्यांनी आवश्यक बाबींची पुर्तता करून घ्यावी, असे आवाहन पूणे कृषी आयुक्तालयाचे, कृषी संचालक(विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केले आहे.
पी.एम.किसान योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती,पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) दोन हजार रूपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी सहा हजार रूपये लाभ देण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत.
राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी केंद्र शासनाने 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी.एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी महसूल, ग्रामविकास व कृषी विभागांना या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या मोहिमेमध्ये लाभार्थ्यांनी स्वयं नोंदणी व ई-केवायसीसाठी सर्व सामाईक सुविधा केंद्र तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्यामार्फत कार्यपूर्तता करावी. तसेच आवश्यकतेप्रमाणे पूर्तता करण्यासाठी गावच्या ग्रामस्तरीय नोडल अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.