मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी जगातील तिसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या कंपनीकडे सोपवली आहे. अदानी रिअॅल्टीने या प्रकल्पासाठी ५,०६९ कोटी रुपयांची आणि डीएलएफने २,०२५ कोटी रुपयांची बोली लावली होती. नमन ग्रुपची बोली बिडिंगसाठी पात्र ठरू शकली नाही. प्रकल्पाचे सीईओ एसव्हीआर श्रीनिवासन यांच्यानुसार, यासाठी तिघांनी बोली लावली होती.
महाराष्ट्र सरकारने १७ वर्षांमध्ये धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकल्पामुळे धारावीतील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. हा प्रकल्प २०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा आहे. सरकारने २०१९ मध्येही धारावी विकासासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती, पण नंतर विविध कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली होती.
अदानी समूहाने ५ हजार कोटींची सर्वाधिक बोली लावली आहे. त्याच वेळी डीएलएफ समूहाने २०२५ कोटी रुपयांची बोली लावली आहे.
जागतिक स्तरावर निविदा
प्रकल्पासाठी चौथ्यांदा जागतिक स्तरावर निविदा मागवल्या. या निविदेला आठ कंपन्यांनी उत्सुकता दर्शवली होती. मात्र, प्रत्यक्षात केवळ तीन कंपन्यांनीच आपल्या निविदा सादर केल्या होत्या.