• Fri. Apr 26th, 2024

किल्लारी भूकंप’ ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते….

Byjantaadmin

Sep 30, 2022

 

किल्लारी भूकंप

घटना – ३० सप्टेंबर १९९३

किल्लारी भूकंप’ ज्याची आठवण आजही आपल्या सर्वांना हादरवून सोडते

१९९३ सालच्या ३० सप्टेंबरला भारतीय प्रमाणवेळे नुसार पहाटे ३.५६ वाजता लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत एक भूकंप झाला, त्याला लातूरचा भूकंप म्हटले जाते. या भूकंपाचे केंद्र सोलापूरच्या ईशान्येस ७० किमी अंतरावर होते. रिश्टर स्केलवर ६.०४ तीव्रता मोजला गेलेल्या ह्या भूकंपात अंदाजे ७९२८ माणसे मृत्युमुखी पडले, १५८५४ जनावरांचा मृत्यू झाला, तर सुमारे १६००० लोक जखमी झाले. ५२ गावांतील ३० हजार घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर १३ जिल्ह्यांतल्या २ लाख ११ हजार घरांना तडे गेले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला. ह्या दोन तालुक्यांतील एकूण ५२ गावे उद्‌ध्वस्त झाली. ३० सप्टेंबर १९९३ ची रात्र आज ऐन विशी तिशीत असणाऱ्यांना कदाचित आठवत नसेल पण ती आजही अखंड महाराष्ट्राच्या मनात कुठेतरी भीतीचं गच्च आवरण घेऊन दडून बसली आहे. जवळपास १०,००० लोकांना एकाचवेळी आपल्या कुशीत घेणारी किल्लारीची धरती आज शांत निपचित पडून आहे.

पंचवीस वर्षापूर्वी झालेल्या या दुर्दैवी घटनेची साक्ष द्यायलाच हयात असावीत अशी अनेक घरं आपल्या शेवटच्या घटका मोजत तिथे उभी आहेत. तिथल्या शाळा गेल्या अनेक काळापासून कुठल्याही विद्यार्थ्या विना आपल्या अवशेषांची दखल घ्यायला लावत आहेत. जे पंचीवीस वर्षांपूर्वी झालं ते आज किंवा पुढे कधीही होऊ शकतं का? हा प्रश्न मात्र सातत्याने गेली २५ वर्ष पाठपुरावा करतोय हे सत्य नाकारता येत नाही.

३० सप्टेंबर १९९३ ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा तो दिवस होता. सारा महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावं भूकंपाने हादरून गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. ढिगाऱ्यांत अडकलेले मृतदेह, जखमी लोक, नातेवाईकांना शोधणारे ग्रामस्थ, मदत काम करणारे स्वयंसेवक, कोलमडलेले संसार. ही सगळी चिन्ह हाहाकाराची ही विदारकता काळीज पिळवटून टाकत होती.

त्या दिवशी पत्रकार म्हणून हजर असलेल्यांपैकी बरेच लोक जवळपास याच शब्दात आपला अनुभव सांगतात. त्या रात्री काही तासांत लातूर उस्मानाबादच्या गावागावात स्मशान इतकी अवकळा पसरली. जिकडे तिकडे मृतदेह पडलेले होते. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी सगळ्या महाराष्ट्राला कळल्यावर हलकल्लोळ झाला. कारण पानशेतच्या पुरानंतर महाराष्ट्रावर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच कोसळली होती. या भूकंपातून लातूर उस्मानाबादकर सावरूनही बरीच वर्ष झाली असतील. भूकंपाने त्यांच्या मनावर केलेली जखम मात्र बरी झालेली नाही. त्यादिवशी न जाने किती हात मदतकार्यात काम करत होते. देशातल्या कुठल्या कुठल्या भागातून तात्काळ मदत येत होती.

काही काळानंतर लष्करानं सगळ्या परिस्थीचा ताबा घेतला आणि बचाव कार्याला थोडा वेग आला. या भूकंपाच्या पूर्वी पर्यंत महाराष्ट्रातला भूकंपप्रवण भाग म्हणून कोयना खोऱ्याचा भाग विचारात घेतला जात असे. तिथे छोटे मोठे अनेक धक्के बसत असत. मात्र भूकंपाचा इथला केंद्रबिंदू पुढे लातूर-उस्मानाबाद सारख्या ठिकाणी सरकेल असं कुणाच्याही ध्यानीमनी चुकूनही नव्हतं.

या भूकंपाचा फटका जवळपास ५२ गावांना बसला होता. दु:ख, हताशा, निराशा यांनी भरलेलं वातावरण सगळीकडे होतं. प्रत्येक घरातलं कुणी ना कुणी गेलेलं होतं. काही घरांतली दहा-बारा-चौदा माणसं गेलेली होती. जे वाचले होते त्यांच्या डोळ्यांतही हा मसणवटा पाहायला मी कशाला मागे उरलो, असा आक्रोश स्पष्ट दिसत होता.

किल्लारी-सास्तूरच नव्हे तर मंगरूळ, पेट सांगवी, होळी, तळणी, कवठा, एकोंडी, रांजगाव, चिंचोळी, सालगाव अशा आजूबाजूच्या सगळ्याच गावांत हे दृश्य पाहायला मिळत होतं. केवळ गावाचं नाव वेगळं, एरवी भूकंपाचा उत्पात सगळीकडे सारखाच होता.

लातूर-उस्मानाबादच्या या भूकंपाने नेमके किती बळी घेतले, याचा आकडा आजही वेगवेगळा सांगितला जातो. महाराष्ट्र सरकारच्या लातूर जिल्ह्याच्या वेबसाइटवर मृतांचा आकडा ७९२८ इतका आहे, तर काही जण या भूकंपात दहा हजारहून अधिक मृत्युमुखी पडले, असा दावा करतात.

मिडियाने सुद्धा त्या काळातही ‘एक पाउल पुढे’ राहण्याच्या नादात काही ठिकाणी ५०,००० हजाराचा आकडा सांगितल्याचे नोंद आहे. पण आकडेवारीपेक्षा मात्र तिथला आक्रोश आणि त्याचा प्रभाव मात्र अजून भयाण आणि क्लेशकारी होता. तो अनुभव आज मृतांचा आकडा कितीही मोठा पाहिला तरी समजून घेता येत नाही.

या भूकंपात अनेक कुटुंब उद्ध्वस्थ झाली, त्यात एक कुलकर्णीचं पण घर होतं. लीम्बोली गावातल्या नंदकुमार कुलकर्णी यांनी त्या रात्री आपले घरातले १२ सदस्य गमावले. आज त्या भूकंपग्रस्त जागेवर तिथल्या ग्रामपंचायतीने मोठा रोपवन उभारलं आहे.

कुलकर्णी सारखे अनेक जन तिथे कुठल्या न कुठल्या झाडाखाली आज आपापल्या जवळच्या व्यक्तीची आठवण काढत बसताना दिसतात. त्या रात्री फक्त हाहाकार होता हे सत्य आहे, पण त्यातही काही चमत्कारीकरित्या बचावलेले माणसे आहेत. हे आज सांगूनही न पटण्यासारखा आहे.

त्या रात्री एक बाप आपल्या १८ महिन्यांच्या तान्हा मुलीसाठी हृदय पिळवटून टाकेल इतक्या आक्रोशात रडत होता. एका लष्करी वेशातल्या अधिकाऱ्याला, श्री. सुमित बक्षी यांना ते पाहवलं नाही आणि त्यानी स्वत:च भुयार खोदुन त्या मुलीचा शोध सुरु केला. जवळपास ७ फुट खाली खोदल्या नंतर एका पलंगाखाली ती मुलगी सुखरूप सापडली. तब्बल पाच दिवस या सगळ्यात गेले आणि ती मुलगी कशी काय जिवंत राहिली हे कोड बनलं. म्हणूनच तिला नाव दिलं गेलं ‘मिराकॅल बेबी’.

ही २६ वर्षांची ‘मिराकॅल बेबी’, प्रिया जवळगे आज तिथल्याच एका गावात शाळेत मुलांना शिकवण्याचं काम करते. तिच्या जन्मानंतर अनेक लोकांनी तिला दत्तक घेण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन कुटुंबान ११ लाख दिले तर श्रीलंकन कुटुंबान तिच्या इतकं सोनं दिलं, पण ती आपल्या गरीब आई बापाकडेच निश्चिंत राहिली. पुढे जेव्हा शरद पवारांना समजलं तेव्हा त्यांनी तिच्या आई वडिलांचा सत्कार केला.

प्रचंड हानी झाली, प्रचंड हाहाकार झाला तरी काही जन मात्र तिथेच आपली जुनी पुराणी घरं सारखी करून पुन्हा राहिले. सास्तूर मधले काकासाहेब पाटील हे त्यातलेच एक नाव. सास्तूर मधल्या ६०० बळींपैकी काही काका साहेबांच्या घरातले होते, मात्र तरीही पुन्हा आपली गढी सारखी करून आजपर्यंत काकासाहेब त्यात राहतात. सोबत काही गाडी, काही कुत्रे आहेत मात्र आताही त्या रात्रीच्या भयाण आठवणी आहे हे ते खेदानं नमूद करतात.

त्या रात्रीची घटना बघितली तर माणसाचं निसर्गापुढचं अस्तित्व नगण्य ठरतं. आपण किती खुजे आहोत याची जाणीव होते. हे सगळं एक क्षण मागे टाकता ही येतं. पुढे प्रगती करून या सगळ्यासारख्या गोष्टींसाठी उपाययोजना करता येतात पण झालेली हानी काही परत उभी करता येत नाही.

तत्कालीन राज्य शासनाने नव्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत स्वतंत्र भूकंप व पुर्नवसन विभागाची स्थपना केली…या विभागाच्या सचिवपदी श्री.जॉनी जोसेफ व मुख्य अभियंता तथा सहसचिव पदी श्री.सी.डी.फकीर यांची नेमणूक केली,तात्काळ निर्णय व सामाजिक व मानवी मूल्य सांभाळत या जोडीने व त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्ट काम त्या ठिकाणी केले,आजही आशिया खंडात किंवा भारतात कुठेही भूकंपासरखी आपत्ती निर्माण झाली तर अभियंता श्री.सी.डी.फकीर यांना पुनर्वसन व व्यवस्थापन यासाठी तेथे बोलावले जाते…

आज पंचवीस वर्षानंतर किल्लारी बरंच बदललं आहे. त्यात अनेक सुधारणा झाल्यात पण काही मुलभूत सुधारणांसाठी आजही तिथे प्रतीक्षा करावी लागत आहे. जगातल्या काही मोठ्या पुनर्वसानांपैकी एक असणाऱ्या या गावांत आजही रस्ते नाही ही सत्य परिस्थिती आहे. पुनर्वसनानंतर वसवलेलं गाव आणि शेतीची जमीन यात बरंच अंतर पडलंय. तिथं आता शेती करावी असही काही उरलेलं नाही. रोजच्या आयुष्यातल्या प्रश्नांशिवाय असे अनेक प्रश्न ती गावं आजही जमेल तशी सोडवत आहेत.
संकलन
सोशल मीडिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *