शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला. दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांसाठी विशेष जेवणाची सोय करण्यात आली होती. पण जेवणाचे योग्य नियोजन न केल्याने मोठ्याप्रमाणावर अन्नाची नासाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवणाने भरलेले आणि उष्ट जेवण असलेले हजारो ताट पडलेले पाहायला मिळाले. विशेष म्हणजे हा कार्यक्रम शासकीय होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांची अशी उधळपट्टी पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तर याचे काही फोटो देखील व्हायरल झाली आहेत.
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे आज (26 मे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजनांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शिवसेना आणि भाजपचे अनेक महत्वाचे नेते देखील कार्यक्रमास्थळी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. कन्नड, वैजापूर, सिल्लोडसह सोयगाव तालुक्यातील हजारो नागरीक देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमासाठी आलेल्या नगरीकांना आयोजकांकडून पाण्यासह जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी जेवेणाची योग्य व्यवस्था आणि नियोजन न करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर जेवणाची नासाडी झाल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांसाठी तयार करण्यात आलेलं उष्ट जेवण मोठ्या प्रमाणावर फेकून देण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोठ्या प्रमाणावर पोळ्या, भाजी आणि भात अक्षरशः कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळत होते. तर कामगारांनी हे उष्ट जेवण पायाखाली तुडवताना दिसून आले. तर जेवणाने भरलेले आणि उष्ट जेवण असलेले हजारो ताट पडलेले पाहून संताप व्यक्त केला जात होता. विशेष म्हणजे हा सर्व कार्यक्रम शासकीय खर्चातून आयोजित करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका…
दरम्यान, यावेळी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “उद्या दिल्लीत संसद भवनाचे उद्घाटन होणार आहे. पण त्याला विरोध करण्यात येत आहे. पण संसद भवन पवित्र मंदिर असून, तिथे सर्व खासदार जाऊन बसतात. देशातील खासदार येथूनच जनतेचे प्रश्न मांडतात. हे एक ऐतिहासिक काम असून, तरीही याला विरोध करतात. याचा अर्थ ही पोटदुखी आहे. याकामाचे मोदींना श्रेय मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरु असल्याचे शिंदे म्हणाले. तर केजरिवाल मुंबईत येतात ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात आणि दुसरे तिसऱ्याला तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्याच्या दारी आणि ते त्याच्या दारी जात आहेत. पण आपण कोणाच्या दारी जात नाही. त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वाना भारी असल्याचं शिंदे म्हणाले